जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीय

“कडक उन्हात पोटासाठी लढणाऱ्यां, वस्तू व फळ विक्रेत्यांना पोलिसांकडून मायेची छत्री”

“उन्हाच्या झळांपासून दिलासा; रस्त्यावरील विक्रेत्यांना छत्री व वॉटर बॉटल वाटप”


जळगाव प्रतिनिधी:  शहरात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र या कडक उन्हातही अनेक गरीब आणि मेहनती हात रोज रस्त्याच्या कडेला बसून छोट्यामोठ्या वस्तू विकत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
कोणी फळं विकतंय, कोणी खेळणी, तर कोणी थंड पाणी… अंगावर उन्हाचे चटके बसत असतानाही “आजचा दिवस गेला पाहिजे” या आशेवर त्यांचा संघर्ष सुरू आहे.
याच संघर्षाची जाणीव ठेवत जळगाव पोलिसांनी एक संवेदनशील उपक्रम राबवत २० निवडक रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांना ट्रॅफिक ऑफिसमध्ये बोलावून त्यांना उन्हापासून संरक्षणासाठी छत्री आणि गार पाणी ठेवण्यासाठी मिल्टनच्या बाटल्या भेट दिल्या.
विशेष म्हणजे, या विक्रेत्यांची निवड देखील अत्यंत पारखून करण्यात आली. दिवसभर उन्हात बसून प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या आणि कुटुंबासाठी झगडणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले.
यावेळी पोलिसांनी प्रत्येक विक्रेत्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, रोजचा संघर्ष आणि जगण्यासाठीची धडपड जाणून घेतली. अनेकांच्या डोळ्यांत त्या क्षणी आनंदासोबत भावनाही दाटून आल्या.
बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी जणू या परिस्थितीचं वास्तव सांगून जातात —
“अरे संसार संसार,
कसा नाही गड्या मान?”
“एका घासाला कागा,
दुसरा सुके उभा प्राण!”

अर्थात,अरे संसार तुला काहीच मान नाही का? तू इतका कठीण आणि निर्दयी का आहेस? एखाद्याला सहज अन्न मिळते तर दुसऱ्याचा जीव तडफडतो.

बहिणाबाई चौधरी यांच्या या शब्दांत जगण्याची वेदना आहे… आणि जळगाव पोलिसांच्या या उपक्रमात त्या वेदनेवर मायेचा हात दिसून आला.
कडक उन्हात घाम गाळणाऱ्या या छोट्या विक्रेत्यांना मिळालेली ही मदत केवळ वस्तूंची नव्हती, तर “तुमचा संघर्ष आम्हाला दिसतोय” हा दिलासादेखील होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button