तुटलेल्या नाला कठड्यांवर तातडीने उपाययोजना करा; उपमहापौर मनोज चौधरी यांचे बांधकाम विभागाला आदेश.
तुटलेले नाला कठडे ठरताहेत जीवघेणे; उपमहापौरांनी घेतली दखल
प्रतिनिधी: जळगाव शहरातील लहान-मोठ्या नाल्यांवरील तुटलेले कठडे (रेलिंग) आणि अनेक ठिकाणी कठडेच नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा बांधकाम विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेरी नाका परिसरातील नाला तसेच शिवाजी उद्यानाजवळील नाल्यावरील कठडे पूर्णपणे तुटले असून शहरातील इतर अनेक ठिकाणीही अशीच धोकादायक परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या पावसाळ्यामुळे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. या मार्गांवरून दररोज शाळकरी मुले, स्कूल बस, रिक्षा तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होत असल्याने तातडीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांत तुटलेल्या कठड्यांमुळे दुर्घटना घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांना संबंधित ठिकाणांची तात्काळ पाहणी करून फॅब्रिकेशनच्या माध्यमातून तात्पुरती किंवा आवश्यक ती संरक्षक व्यवस्था उभारण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
यावेळी उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले, “नागरिकांचा आणि विशेषतः लहान मुलांचा जीव मोलाचा आहे. पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बांधकाम विभागाने गांभीर्याने आणि युद्धपातळीवर तात्काळ काम सुरू करावे.”