मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान – पालकमंत्री गुलाबराव पाटील..
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हास्तरीय समिती बैठकीत योजनेचा सखोल आढावा
जळगाव, दिनांक 24 एप्रिल (जिमाका): राज्य शासनाची मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. या योजनेची संबंधित यत्रणांनी जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात “मुख्यमंत्री बळीराजा, शेतपाणंद, रस्ते, योजना”
जिल्हास्तरीय समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता संजय राठोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंखे, सा.बा.चे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना” केवळ कागदावरची योजना नसून बळीराजाच्या आयुष्यात बदल घडवणारी आहे. त्यामुळे या कामात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असे सांगून त्यांनी पुढे स्पष्ट केले की, रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत अधिकारी वर्गाने विशेष दक्षता घ्यावी आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समित्या स्थापन करून स्थानिक आमदारांना विश्वासात घेत कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. “चार चाकी आणि इतर गाड्यांच्या सोयीपेक्षा शेतात जाणाऱ्या बैलांच्या पावलांचा विचार करणारी ही योजना आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे,” असे सांगत त्यांनी योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. या योजनेची अंमलबजावणी 50 टक्के ग्राम सडक योजना व 50 टक्के जिल्हा परिषद यांनी करावी. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा संघ निहाय 14 डिसेंबर, 2025 च्या शासन निर्णयानुसार 25 किलोमीटरचे एक क्लस्टर तयार करुन कामास सुरुवात करण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यावेळी म्हणाले, जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी आठवडयातून एक वेळेस या संदर्भात बैठक घेऊन या कामांना गती दयावी. तालुक्यातील आमदारांना संबंधित अधिका-यांनी भेटून त्यांच्या सूचनेप्रमाणे काम सुरु करावे, असे त्यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती घाटगे यांनी योजने बाबत माहितीचे सादरीकरण केले.
याबैठकीत जिल्हयाच्या प्रति तास दरास (एल 1) ला जिल्हयास्तरीय समितीने मान्याता दिली.