महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी; सकाळी १० नंतर आल्यास दंडात्मक कारवाई
पण काही कर्मचारी मनपाचा घेतात पगार,पण काम राजकीयच्या दारात ! हजेरी घेताच नवीन विषयास चर्चेला आले उधाण.
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता त्यांनी स्वतः कार्यालयात उपस्थित राहून सर्वांची हजेरी तपासली.
“उद्यापासून सर्वांनी सकाळी ९:४५ वाजेपर्यंत कार्यालयात हजर राहावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला. काही दिवसांपासून अधिकारी-कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. “अधिकारी वेळेवर भेटत नसल्याने कामे रखडतात,” अशी नाराजी जळगावकर व्यक्त करत होते. त्याची दखल घेत महापौरांनी थेट कारवाईचा पवित्रा घेतला.
सकाळी ९:५० वाजता अचानक भेट दिल्यानंतर अनेक कर्मचारी आपल्या सोयीनुसार ड्युटीवर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. “प्रशासक कालावधी संपला असून आपण नागरिकांच्या कराच्या पैशातून पगार घेतो, त्यामुळे कर्तव्याची जाणीव ठेवून काम करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सकाळी पावणे दहा वाजता महापौर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपस्थित राहून लेटलातिफ कर्मचाऱ्यांची तपासणी केली. हजेरीबाबत कडक नियम लागू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे बघितले असता मनपातील काही कर्मचारी नगरसेवकांचे स्वीय सहायक म्हणून फिरत असतात, ते मनपाच्या विशिष्ट विभागात नियुक्त आहेत, पगार मात्र मनपातूनच घेतात, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. काही कर्मचारी केवळ हजेरी मस्टरवरच असल्याचेही बोलले जात आहे. आणि प्रत्यक्षात ते विभागात कधीही नसतात. तसेच काही आजी-माजी महापौरांकडेही मनपाचे कर्मचारी कार्यरत असल्याची चर्चा रंगली आहे.
या सर्व प्रकारांकडेही नव निर्वाचित महापौर ताई लक्ष देणार का, अशी चर्चा आता कर्मचारी व नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.